गणेशोत्सव 2009
 
मंडळाची माहिती
कार्यकारिणी सदस्य 2010
सामाजिक उपक्रम
इतर सण
देणगी
गणेशोत्सवासाठी मार्ग
वॉलपेपर
Click for Prabodhini
www.lalbaugcharaja.com
आता भारतातल्या भाविकांसाठी www.lalbaugcharaja.in
या स्वरुपात उपलब्ध आहे.
    होमपेज   छायाचित्र संग्रह   मंडळाची माहिती   संपर्क
 
-: मंडळ राबवित असलेले उपक्रम :-
लालबागच्या राजाची महती सर्वदूर पसरू लागली. त्याचीच प्रचिती म्हणजे मंडळाकडे जमा होणाऱया आर्थिक निधीमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली. या निधीचा वापर विविध सामाजिक उपक्रमांकरिता मंडळ करीत असते. एकीकडे सार्वजनिक उत्सव साजरे करीत असताना दुसरीकडे मंडळ समाजसेवा, समाजप्रबोधनाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना घडविण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम राबविते.
 
मंडळ राबवित असलेले उपक्रम
 

 
रुग्ण सहाय्य योजना
सध्याच्या या महागाईच्या परिस्थितीत रोगावर उपचार करणे सामान्यांस कठीण झाले आहे. मंडळाने या स्थितीत के.ई.एम.रुग्णालय, लोकमान्य टिळक(सायन)रुग्णालय, नायर रुग्णालय, शताब्दी रुग्णालय, जे.जे.रुग्णालय, गोकुलदास तेजपाल रुग्णालय, कामा अँड आल्ब्लेस रुग्णालय, टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालय अशा महापालिका व शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना अर्थ सहाय्य करीत असते. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले नागरिक या रुग्ण सहाय्य योजने अंतर्गत लाभ घेतात. दरवर्षी मंडळ हजारो रुग्णांना मदत करीत असते.
 

 
लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र (शासनमान्य)
सध्याच्या या आधुनिक युगात संगणक ज्ञान हे प्रत्येकासाठी अनिवार्य झाले आहे.  समाजाची ही गरज लक्षात घेऊन मंडळातर्फे सर्वांसाठी खुले असे लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र अल्प दरात सुरु करण्यात आले आहे.  सुसज्ज व अद्ययावत अशा या संगणक प्रशिक्षण केंद्रात ऑफिस ऑटोमेशन, डि.टी.पी., टॅली, ऑटोकॅड इ. अभ्यासक्रम नाममात्र दरात शिकविले जातात. या संगणक प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासनमान्य MS-CIT अभ्यासक्रमाचे वर्ग घेतले जातात.
 

 
महिलांसाठी मोफत योग प्रशिक्षण केंद्र
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले की स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. तसेच निरोगी स्त्री आपले घरही निरोगी ठेवते. आपण सगळे जाणतोच की आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योगाभ्यासाला पर्याय नाही म्हणूनच स्त्रीयांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मंडळाने सन 2005 पासून महिलांसाठी योग प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या योग केंद्राचा लाभ असंख्य महिला घेत आहेत. 
 

 
लालबागचाराजा प्रबोधिनी

समाजाच्या तळागाळातील गरीब, गरजू व होतकरु विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदविण्यासाठी मंडळाने नुकतीच लालबागचा राजा प्रबोधिनी उभी केली आहे.  या प्रबोधिनीमध्ये साने गुरुजी अभ्यासिका, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, संत ज्ञानेश्वर पुस्तक पेढी, स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र व अभ्यासवर्ग, इंग्रजी संभाषण वर्ग हे उपक्रम राबविले जातात.

लालबागचा राजा प्रबोधिनीचे उदघाटन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.जयराज फाटक यांच्या शुभहस्ते पार पडले. उदघाटन प्रसंगी श्री.दगडूदादा सकपाळ (आमदार), श्री.किशोर गजभिये(अतिरिक्त मनपा.आयुक्त), प्रख्यात नेत्रशल्य-विशारद पद्मश्री डॉ.तात्यासाहेब लहाने हे उपस्थित
 

 
साने गुरुजी अभ्यासिका
कुटुंबातील माणसांची गर्दी, घराची लहानशी जागा या गोष्टी लक्षात घेऊन मुंबईतील मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी मंडळाने मोफत अभ्यासिका चालू केली आहे. ही अभ्यासिका संपूर्णत: वातानुकूलित असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळण्याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. ही अभ्यासिका सकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत खुली असते.
 

 
स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय
आपण जाणतोच की वाचनामुळे मनुष्याची विचारशक्ती परिपूर्ण होते. तसेच सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षणाला पर्याय नाही. पण उच्च शिक्षणासाठी लागणाऱया पुस्तकांच्या किंमतीही उच्च असतात. पुस्तकांच्या वाढणाऱया किंमतींमुळे कित्येक चोखंदळ वाचक वा शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी पुस्तके विकत घेऊ शकत नाही.

अनेक विद्यार्थी व वाचकांची ही अडचण लक्षात घेऊन मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर  ग्रंथालय सुरू करण्यात आले. यात कथा-कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, नाट्य-कविता, ऐतिहासिक, राजकीय, आरोग्य, विज्ञान आणि बालवाङमय अंतर्गत अनेक नामवंत लेखकांची दर्जेदार साहित्यकृती तसेच इंग्रजी साहित्य विश्वातील दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. यासोबत ग्रंथालयात विविध क्षेत्रातील इ.10वी पासून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, तसेच UPSC/MPSC, MHT-CET, GRE, JEE, AIEEE, CAT, GATE, NDA, CDA, STAFF SELECTION, BARC, बँकिंग, विमा क्षेत्र, भारतीय रेल्वे, भारतीय विमान वाहतूक, इ. स्पर्धा व प्रवेश परीक्षा त्याचप्रमाणे अभियांत्रिकी, कायदा, औषधशास्त्र, वैद्यकीय, संगणक, व्यवस्थापन, शिक्षण शास्त्र विषयक शाखांतील मान्यवर लेखकांची व विविध नामवंत प्रकाशन संस्थांची संदर्भ पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. हे ग्रंथालय संपूर्णत संगणकीकृत, अद्ययावत व सुसज्ज असे आहे.   

 

 
संत ज्ञानेश्वर पुस्तक पेढी
विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षादरम्यान अभ्यासासाठी अनेक पुस्तके नित्यनियमाने लागतात. अशी पुस्तके विकत घेण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. परंतू आर्थिकदृष्टया गरीब विद्यार्थ्यांना ते परवडत नाही.  म्हणून या प्रबोधिनामध्ये राज्यभरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी `संत ज्ञानेश्वर पुस्तक पेढी' सुरु करण्यात आली असून त्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत. या पुस्तक पेढीतील पुस्तके सूंपर्ण वर्षासाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य पुरविली जातात.
 

 
स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती  
अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे शिक्षणाबरोबरच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यामुळे काहींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. मंडळातर्फे अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांकरिता स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून त्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत.
 

 
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र व अभ्यास वर्ग
या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांविषयी व त्यांच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती मिळावी म्हणून मंडळाने प्रबोधिनीमध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. त्या बरोबरच मंडळ विविध स्पर्धा परीक्षासांठी अभ्यास वर्ग देखील आयोजित करते.

IAS / IPS प्रशिक्षण शिबीर
शैक्षणिक उपक्रमाचाच भाग म्हणून सन 2007 पासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत सेवा करण्याची संधी मिळावी व UPSC परीक्षेचे नेमके स्वरुप कळावे, या परीक्षेच्या पूर्वतयारी पासून ते त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी या हेतूने प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकाऱयांच्या उपस्थितीत IAS/IPS प्रशिक्षण शिबिर आयोजित करते.  या उपक्रमाचा सातत्याने दोन वर्षे हजारो विद्यार्थी लाभ घेत आले आहेत.

MPSC मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण वर्ग :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे(MPSC) घेण्यात येणाऱया विविध परिक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व त्यांना अच्युत्य यश प्राप्त व्हावे म्हणून या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता वेळोवेळी मार्गदर्शन शिबीर व प्रशिक्षण वर्ग मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतात. या मोफत उपक्रमाचा शेकडो विद्यार्थी लाभ घेत आले आहेत.

भारतीय स्टेट बँक (SBI) लिपिक भरती परीक्षा प्रशिक्षण वर्ग
गतवर्षी भारतीय स्टेट बँकेच्या लिपिक पदाच्या भरती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता दोन बॅचमध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते. या प्रशिक्षण वर्गाचा असंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या परीक्षेस बसलेल्या शारिरीकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांकरिताही विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.

इंग्रजी संभाषण वर्ग वर्ग
जागतिक पातळीवर संवाद साधण्यासाठी इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही.  मराठी मुलांमध्ये असलेला इंग्रजी भाषेच्या वापराबाबतचा न्यूनगंड दूर करण्याकरिता मंडळाने विविध वर्गातील विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी संभाषण वर्ग सुरू केले आहेत.
 
 
रायगड जिह्यातील पूरग्रस्तांना  मदत
26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह कोकण विभागाला महापुराचा जोरदार तडाखा बसला. अनेक ठिकाणी व गावात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये शेकडो लोक मृत्यू पावले. हजारो लोक बेघर झाले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. मंडळाच्या 100 कार्यकर्त्यांचे पथक 8 दिवस महाड पोलादपूर तालुक्यात गेले होते. सोबत 7 डॉक्टरांचे पथकही होते. या आपद्ग्रस्त व दरडग्रस्तांना अन्नधान्य, कपडेलत्ते, भांडीकुंडी व वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. याकरिता मंडळाने रु. 12 लाख इतका निधी खर्च केला. कोंडीवते गावातील एकाच कुटुंबातील 22 माणसे दरड कोसळून ढिगाऱयाखाली गाडली गेली. त्यातील फक्त एकच महिला जिवंत राहिली. तिचे नाव श्रीमती सविता सकपाळ. तिला सरकारकडून मदत मिळेपर्यंत मंडळाने दरमहा रु. 1000/- ची मदत पाठविली व तिला जीवनावश्यक वस्तुंची मदत केली. पोलादपूर तालुक्यातील कोंडवी गावातील गँगरीन झालेल्या एका महिलेच्या पायावर शस्त्रक्रिया करुन तिला मरणाच्या दारातून बाहेर काढले.

मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी बदलापूर, कुर्ला (कामगार नगर) येथील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु इत्यादींचे वाटप केले. दिवा येथील आपद्ग्रस्तांना देखील अन्नधान्य, कपडे, चटया, भांडी इत्यादींचे वाटप केले.

पनवेल व गोरेगांव येथे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय शिबीर आयोजित करुन लोकांना टि.टी. इंजेक्शन्स टोचण्यात आली व अँटीबायोटिक्स, टॉनिक्स इत्यादींचे वाटप करण्यात आले. पनवेल येथील `शांतीवन' या कुष्ठरोग्यांच्या आश्रमात रु.2 लाख किमतीची औषधे मंडळाकडून मदत म्हणून देण्यात आली.

26 जुलै 2005 रोजी आलेल्या भयंकर महापुरामध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील शिवाई शिक्षण संस्थेचे महाविद्यालय संपूर्णपणे वाहून गेले होते. मंडळाने रु. 3 लाखांचे 2 वर्ग नव्याने बांधकाम पूर्ण करुन शिवाई संस्थेच्या महाविद्यालय उभारणीस खारीचा वाटा उचलला.
 

 
जुई गाव पुनर्वसन प्रकल्प
दि.26 जुलै 2005 रोजी आलेल्या प्रलयंकारी महापुरामध्ये रायगड जिह्यातील महाड तालुक्यातील जुई गावात प्रचंड दरड कोसळून त्या दरडी खाली अनेक घरे गाडली गेली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली. एकुण 66 घरातील लोक बेघर झाले. या लोकांचे पुनर्वसन करण्याचा शब्द मंडळाने जुईकरांना दिला होता. त्याप्रमाणे मंडळाने तशी तयारीही केली. त्यापैकी 30 घरांचे पुनर्वसन करण्याची संधी मंडळाला प्राप्त झाली. प्रत्येकी 400 चौरस फुटांचे एक घर याप्रमाणे मंडळाने रु.50 लाख खर्च करुन 30 घरांचे बांधकाम पूर्ण केले. मंडळाने जुईकरांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.  सदर दरडग्रस्तांना या घरकुलांचे चाव्या वाटप गुरुवार दि.26 एप्रिल 2007 रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री  श्री.विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते जुई गावात करण्यात आले.  तत्प्रसंगी रायगड जिह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे, महाडचे आमदार माणिकराव जगताप, लालबागचे आमदार दगडूदादा सकपाळ, महाडचे जिल्हाधिकारी कांबळे साहेब, प्रांताधिकारी डॉ.शिवाजी पाटील, महाड व जुई गावाचे ग्रामस्थ व लोक प्रतिनिधी, तसेच शासनाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. .
 

 
रुग्णांना फळ वाटप

अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंडळाने गतवर्षी के.ई.एम.रुग्णालय, वाडिया रुग्णालय, टाटा रुग्णालय, लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालय, नायर रुग्णालय, जे.जे.रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय या महापालिका व शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप केले. 

पाऊस कितीही पडला तरी शेतकऱयाच्या घामाचे थेंब शेतात पडल्याशिवाय पीक येत नाही, त्याचप्रमाणे पैशाचा कितीही पाऊस पडला तरी कार्यकर्त्यांच्या कष्टाशिवाय मंडळाचा विकास होत नाही. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वैयक्तिक कामकाजातला आणि कुटुंबातला वेळ खर्च करुन विनामोबदला मंडळासाठी काम करुन वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार, विभागातील रहिवाशी, व्यापारी आणि समस्त भाविकाच्या सहकार्याने गेली 75 वर्षे मंडळाचा नंदादीप सातत्याने तेवत ठेवला आहे. आणि यापुढे देखील हा नंदादीप असाच तेवत ठेवू याची मंडळ खात्री देत आहे. 

 

 
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
गतवर्षी अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंडळाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याचे ठरविले होते. या शस्त्रक्रिया जे. जे. रुग्णालयातील प्रख्यात नेत्रशल्यविशारद मान. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या अधिपत्याखाली करण्यात आल्या. या वैद्यकीय उपक्रमाकरिता रु.67.50 लाख इतका निधी वापरण्यात आला.