गणेशोत्सव 2009
 
मंडळाची माहिती
कार्यकारिणी सदस्य 2010
सामाजिक उपक्रम
इतर सण
देणगी
गणेशोत्सवासाठी मार्ग
वॉलपेपर
Click for Prabodhini
www.lalbaugcharaja.com
आता भारतातल्या भाविकांसाठी www.lalbaugcharaja.in
या स्वरुपात उपलब्ध आहे.
    होमपेज   छायाचित्र संग्रह   मंडळाची माहिती   संपर्क
 
-:गणेशोत्सव मंडळ :-
लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली तीच मुळी नवसाने.  सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार सन 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह,  डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे 1934 साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्री ची मूर्ती प्रसिध्द झाली.

असे असले तरी तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती-करीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. सन 1934 ते 1947 या स्वातंत्र्यपूर्व काळात विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत. अखिल भारतीय पुढारी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, एस.एम.मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्वनिष्ठ अनंतराव गद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी एस. के. पाटील, गो. बा. महाशब्दे, भुलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी येथे व्याख्याने देऊन जनजागृती करीत असत.

सन 1942 हे साल महात्मा गांधीच्या चलेजाव चळवळीचे होते. या चळवळीत मंडळाचे कार्यकर्ते कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ.व्ही.बी.कोरगावकर, हाटले इ.नेत्यांची धरपकड करण्यात आली.

त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. सन 1946 साली `श्री' ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. सन 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात `श्री' ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. 1948 साली महात्मा गांधी स्वर्गवासी झाले. तेव्हा गांधींजींची प्रतिकृती गजाननाच्या स्वरुपात दाखविण्यात आली.

सन 1947 सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा साहजिकच बदलण्यात आली. आता मंडळाने राष्ट्रउभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले. मंडळाच्या शिलकी निधीतून कस्तूरबा फंड, 1948 साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, 1959 साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले.

सन 1958 साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश' आणि `कालियामर्दन' हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे अविस्मरणीय देखावे अजूनही  लोकांच्या स्मरणात आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म. ल. पाटील, ना. गणपतराव तपासे, ना. गोविंदराव आदिक, ना.मालोजी निंबाळकर, म्यु.कार्पोरेटर डॉ.नरवणे, नवाकाळचे सहसंपादक गोविंदराव महाशब्दे, प्रकाशचे वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे श्री. गोवर्धनदास मपारा, काकासाहेब तांबे यांची व्याख्याने झाली.

सन 1958 सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. सन 1948 ते 1968 या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रौ पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजतागायात चालू आहे. तसेच दर्शनोत्सुक भाविकांची व्यवस्था करण्यासाठी विविध मंडळाची जागरण पध्दत सुरु केली. त्याच कालावधीत विभागातील गणेशोत्सव मंडळाबरोबरच कुंभारवाडा, दुर्गादेवी, डंकनरोड, नवी अमृतवाडी, कामाठीपुरा, खेतवाडी या गणेशोत्सव मंडळांशी देखील जिव्हाळयाचे संबंध प्रस्थापित केले ते पुढे दृढ होत गेले व यापुढे आणखी दृढ होत जातील याबद्दल शंका नाही.

सन 1934 ते 1968 या काळात कुंवरजी जे. शहा, डॉ. व्ही, बी. कोरगांवकर, एच. बी. कोरगावकर, डॉ. यु. ए. राव, डॉ. मंजु मदार, रामचंद्र तवटे, बी. डी. बांदेकर, रघुनाथ खामकर, प्राणजीवन मेहता, रामबली हलवाई, राम जाधव या प्रभुतींनी प्रामुख्याने मंडळाची धुरा सांभाळली.

सन 1969 साली कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्माण झाली. वसंतराव भोसले यांचे दमदार नेतृत्व मंडळाला लाभले. त्यांना ऍड. नागेश पवार, का. सि. महाडिक, मदन कडू, दत्ताराम दळवी, सखाराम आंबे, रमेश चव्हाण, सिताराम साळवी, चंद्रकांत खाडये, जयप्रकाश कोरगांवकर यांची साथ लाभली. त्यांच्याच नेतृत्वाखाली मंडळाने नव्या कार्याची उभारणी केली. मंडळाचा कार्यव्याप वाढत चालला होता. त्याकरीता स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. सन 1970 साली हनुमान मंदीराचा जिर्णोध्दार करावा असे ठरले. 1971 साली जिर्णोध्दारास सुरुवात होऊन 1973 साली मंदीर नवीन स्वरुपात बांधले गेले व तेथेच एका सुबक कार्यालयाची देखील निर्मिती केली गेली. 1975 साली भवानी मातेची मंदीरात कायमस्वरुपी स्थापना करुन त्याच ठिकाणी नवरात्रौत्सव साजरा करण्यात येऊ लागला.

सन 1982 सालापासून रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमालेस पुनश्च प्रारंभ झाला. तसेच वाचनालय सुरु करण्यात आले. सन 1983 साली मंडळाने 50 वर्षे पूर्ण केली. यावेळी मंडळाने सात घोड्यांच्या रथात बसलेली सूर्यनारायणरुपी गणेशमूर्तिची स्थापना केली होती. तसेच मागील एकोणपन्नास वर्षात झालेल्या गणेशोत्सवातील देखाव्याचे हुबेहुब प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन भाविकांचे आकर्षण झाले होते. सुवर्णमहोत्सवी वर्षांचे अध्यक्षपद चंद्रकांत खाडये यांनी भुषविले होते तर सरचिटणीस व खजिनदार म्हणून वसंतराव भोसले व मारुती तळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. पानसुपारी समारंभात सुवर्णमहोत्सवा निमित्त माजी कार्यकर्त्यांचा व हितचिंतकांचा गौरवचिन्ह  देऊन सत्कार करण्यात आला.

सन 1984 पासून पुन्हा एकदा नवीन पिढीने मंडळाचा कार्यभार हाती घेऊन मागील पिढीने सुरु केलेले कार्य जोमाने पुढे चालू ठेवले. त्यात सर्वश्री रमेश चव्हाण, अशोक पवार, सुभाष सायले, रमेश बोधे, सूर्यकांत मांडवकर, मनोहर पवार, सिताराम नकाशे यांचा सिंहाचा वाटा होता. 1984 साली नवरात्रौत्सव रौप्य महोत्सव दिमाखात साजरा केला. सन 1984 ते 1993 या दशकात अनेक विधायक कामे केली. कोकण पूरग्रस्त निधीस पंधरा हजार रुपयांची देणगी दिली. 1990 साली स्थानिक लोकांच्या गृहनिर्माण समस्या सोडविण्यात पुढाकार घेऊन तत्कालीन महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्याने 72 गाळयांच्या इमारतीचे रेंगाळलेले बांधकाम पूर्ण करुन घेतले. भारत पाकिस्तान कारगिल युध्दाच्या वेळी सीमेवर लढणाऱया भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी `आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडा'करिता रु. 1 लाखाचा धनादेश महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांचेकडे सुपूर्द केला. तसेच नेत्र शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर यांसारखी शिबिरे लोकांकरिता आयोजित केली.

बदलत्या काळानुरुप मंडळाने 2000 साली www.lalbaugcharaja.com ही वेबसाईट सुरु केली. मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री. भरत भुजबळ यांच्या संकल्पतेने व प्रयत्नाने ही वेबसाइट तयार झाली. मंडळाची माहिती, मंडळाचे सामाजिक उपक्रम व लालबागच्या राजाची छायाचित्रे वेबसाइट वर उपलब्ध आहेत. दूर रहाणाऱया भाविकांसाठी ही वेबसाईट फारच उपयुक्त आहे.